प्रतिनिधी : मिलिंद पाटील.
महागाईचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनानंतर जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा पाहायला मिळतंय. आता त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एकीकडे सर्वच गोष्टी महाग होत असताना आणि महागाई वाढत असताना त्यात काहीसा दिलासा सर्वसामान्यांना खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये मिळला आहे. खाद्य तेलाच्या किमतीत आज जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून या किंमतीमधील घसरण पाहायला मिळत असून होळीपासून अधिकची घसरण पाहायला मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामात मोहरीचे तेल १६५ ते १७० रुपये लिटर या किमतीत विकले जात होते, आता ही किंमत कमी होऊन १३५ ते १४० रूपये प्रति लिटरवर आली आहे. मोहरीने गेल्या वर्षीचाच ट्रेंड कायम ठेवल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील एका महिन्यात मोहरीचे तेल १० टक्के, सोयाबीन तेल ३ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव १४०-१४५ रुपयांवरून ११५-१२० रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात १३५-१४० रुपयांवरून ११५-१२० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठात खाद्यतेल पुरवठा साखळी युक्रेन रशिया युद्धामुळे विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. शिवाय खाद्यतेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी,दर आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन या सगळ्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी किमती कमी होण्यामागची ही सर्व कारणे समोर आली आहे.
एकीकडे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे इतर चैनीच्या वस्तूंमध्ये सुद्धा महागाई पाहायला मिळते. मात्र यामध्ये खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना या आवाक्याबाहेर होणाऱ्या महागाईतून थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळतोय.