जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज अखेर 27 जण मृत्युमुखी पडले असून, 57 जण अद्यापही बेपत्ता आहेत, शिवाय आज अखेर शोध मोहीम प्रशासनाने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर एनडीआरएफ, टीडीआरएफ व स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु ढिगाऱ्याखाली मृतदेह सर्वत्र ओळख पटण्याच्या पलीकडच्या अवस्थेत सापडत असल्यामुळे, आज प्रशासनाने अखेर शोध मोहीम थांबवली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील जवळपास 144 लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त स्थळी, लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन व बचाव कार्यात येणारे अडथळे लक्षात घेऊन परिसरात 144 कलम जारी करण्यात आले होते. इर्शाळवाडी गावात जवळपास 43 कुटुंबे राहत होती. त्या कुटुंबातील 228 जणांपैकी 144 जणांना सुरक्षित स्थळी नेण्यास प्रशासनाला यश आले आहे. अद्यापही 57 जण दुर्घटनाग्रस्तस्थळी मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले आहेत अशी माहिती मंत्री महोदय पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त स्थळी मातीच्या अधिकाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांची ओळखण्यापलीकडची अवस्था बघून, बचाव कार्य आज स्थानिक प्रशासनाने थांबवण्याचा आज निर्णय घेतला. दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.