जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
केंद्र सरकारने अखेर कांद्यावर घालण्यात आलेली निर्यात बंदी उठवली असून,केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.आज केंद्रीय मंत्री समितीची बैठक,केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून,त्यात वरील निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्यावर निर्यात बंदी आणली होती व त्या बंदीची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती.मात्र आता केंद्र सरकारने लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन,कांद्याचे निर्यात बंदी उठवल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.
मागील वर्षी कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे व केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लागू करून देखील कांद्याचे दर कमी होत नसल्यामुळे,केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी चे धोरण लागू केले होते.केंद्र सरकारने देखील देशातील नागरिकांना कांदा खरेदी स्वस्त दरात करता यावी म्हणून 25 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री केली होती.केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणल्यानंतर कांद्याचे भाव घसरले होते.त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे जवळपास 2000 कोटी रुपयाहून अधिक नुकसान झाल्याचा दावा शेतकरी संघटनेच्या कडून करण्यात येत होता.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याने,शेतकरी संघटनांनी व शेतकरी बांधवांनी स्वागत केले असून,आता परत पुन्हा निर्यात बंदीचे धोरण लागू करू नये अशी आशा व्यक्ती केली आहे.केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवण्याबरोबरच 3 लाख टन कांदा निर्यातीचा निर्णयही घेतला आहे.एकंदरीत देशातील शेतकरी वर्गाकडून, कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याच्या केंद्रीय मंत्री समितीच्या निर्णयाचे स्वागत झाले आहे.