*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )कोल्हापूर येथे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर बंद अवस्थेतील वॉटर व्हेंडिंग मशीन, चालू करण्याच्या मागणीसाठी आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने, सुराज्य अभियानांतर्गत रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. भारतातील सर्व रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रवाशांना अल्पदरात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी, ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ स्थापित केल्या आहेत; मात्र श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर रेल्वे स्थानक) येथे बसवण्यात आलेले वॉटर व्हेंडिंग मशीन बंद आहे. कोल्हापूरसह वळीवडे, रूकडी, हातकणंगले आणि जयसिंगपूर या रेल्वे स्थानकांवरील मशीनही बंद आहेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकांमध्ये साध्या पाण्याचे जे नळ आहेत ते जवळजवळ ५०% बंद अवस्थेत आहेत, तसेच तेथे अस्वच्छता ही पुष्कळ प्रमाणात आहे. अशी स्थिती जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवरील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ लवकर चालू करावेत, या मागणीचे निवेदन, हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत रेल्वे प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील रेल्वे उप स्टेशन अधीक्षक मेहता यांनी स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणित सुराज्य अभियानाचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे उपस्थित होते. या प्रसंगी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ट्विटर हँडल @surajyacampaign द्वारे बंद मशीनचे छायाचित्र प्रसारित करून दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वॉटर व्हेंडिंग मशीन प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक झाले होते; मात्र आयआरसीटीसीने लाँच केलेल्या या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’वर आता ‘आऊट ऑफ ऑर्डर’ नोटीस चिकटवली आहे. प्रवाशांच्या हितासाठी काम न करणार्या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ किंवा ‘वॉटर एटीएम’ पुन्हा चालू करण्याची प्रक्रिया करावी, तसेच रेल्वे बोर्डाकडे तशी शिफारस करावी. मार्च २०२२ मध्ये, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे अधिकार्यांनी असा दावा केला होता की ते अकार्यक्षम ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ पालटतील; मात्र रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ व्ही.के. त्रिपाठी यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, भारतीय रेल्वेने कोरोना काळातील दळणवळण बंदीपासून रेल्वे स्थानकांवर बंद असलेल्या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ पुन्हा चालू न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांवर केवळ आमच्या पिण्याच्या पाण्याच्या नळांवर पाणी उपलब्ध आहे.
(लिंक : https://www.youtube.com/watch?v=gybrqNzIEsM)
रेल्वे आता ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ ही ‘अयशस्वी योजना’ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे १ लीटरची बाटलीबंद पाणी १५ रुपयांना विकत घेण्याविना प्रवाशांना पर्याय नाही.