जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशातील पंजाब आणि हिमाचल प्रदेश मधील पूर परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून,पंजाब मधील आज तरन तरन आणि फिरोझपुर गावे पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. पंजाब प्रशासनाने पुरात अडकलेल्या लोकांना, लष्कर एनडीआरएफची पथके व इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत कार्य जोरात सुरू केले असून,पूर परिस्थितीमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. पंजाब मधील तरन तरन जिल्ह्यातील धुस्सी बंधारा फुटल्याने 20हून अधिक गावे पाण्याखाली गेली असून, फिरोझपुर जालंदर,पठाणकोट रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गेले काही दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस, जिकडे तिकडे मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनेमुळे, हिमाचल प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी व नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशामध्ये पाणीपुरवठा- दळणवळण व्यवस्था, वीजपुरवठा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणा, पूर परिस्थितीमुळे पूर्णपणे ठप्प झाल्या असून,शेतीला उद्योगाला फळबागांना मोठा फटका बसला आहे. सिमला मधील शिवमंदिरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर गेला असून,अद्यापही 12 व्या दिवशी बचाव कार्य चालू आहे. हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत जवळपास 10,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून,335 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.