जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व अधिष्ठाता,राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर डॉ.प्रकाश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर सेंटर संचलित कॅन्सर ओपीडी दि. ९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आली.सीपीआर हॉस्पिटल येथील ओपीडी क्र.११९ येथे सोमवार ते शनिवार दररोज या कॅन्सर ओपडी अंतर्गत रुग्णांना तपासले जाते.जिल्ह्यात कॅन्सर सेंटरचे अनुभवी कॅन्सर तज्ञ व कर्मचारी दररोज या कॅन्सर ओपीडीमध्ये रुग्णसेवा पुरवतात. कॅन्सर निदानासाठी आवश्यक सर्व तपासण्या जसे की,ब्लड टेस्ट,बायोप्सी,सीटी स्कॅन वगैरे सीपीआर हॉस्पिटलमध्येच होत असल्यामुळे कॅन्सर निदान करणे सोयीस्कर झाले आहे. कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावर उपचार घेण्याकरीता यापूर्वी मुंबई किंवा पुणे या शहरामध्ये जावे लागत होते.परंतु आता ही सेवा कोल्हापूर शहरामध्ये सुरु झाल्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय,कोल्हापूर डॉ.प्रकाश गुरव यांनी दिली.
कॅन्सर ओपीडी मधील एका रुग्णाची शस्त्रक्रिया सीपीआर हॉस्पिटल येथेच पार पडली. पवित्रा कांबळे,वय ७५ वर्षे ही महिला रुग्ण ओठांच्या कॅन्सरने (लीप कॅन्सर) त्रस्त होती.बरेच दिवस ओठांची जखम बरी होत नसल्याने ह्या पेशंटला कॅन्सर ओपीडी मध्ये तपासण्यात आले.ह्या पेशंटला ओठांची कॅन्सर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. दिनांक २५ ऑक्टोबर रोजी ही कॅन्सर शस्त्रक्रिया सीपीआर हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये पार पडली.कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे अनुभवी कॅन्सर सर्जन डॉ.सुरज पवार व डॉ. पराग वाटवे यांनी ही शस्त्रक्रिया केली.ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे.लवकरच सीपीआर हॉस्पिटल मधून ह्या रुग्णाला डिस्चार्ज मिळणार आहे.सीपीआर हॉस्पिटलमध्ये दर आठवड्याला कॅन्सर शस्त्रक्रिया होणार असून पुढील आठवड्यामध्ये देखील कॅन्सर शस्त्रक्रिया नियोजित कण्यात आल्या आहेत.
दि.१६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या दीड महिन्याचा कालावधीमध्ये १०० हून अधिक रुग्णांची कॅन्सर तपासणी पार पडली आहे.या कॅन्सर ओपीडीमध्ये ७५ नवीन कॅन्सर पेशंटचे निदान झाले आहे.या नवीन ७५ रुग्णापैकी ३० रुग्णांचेवर कॅन्सर उपचार सुरु आहेत.कॅन्सरच्या विविध प्रकारानुसार शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी असे उपचाराचे रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयामध्ये घेत आहेत. महत्वाची बाब म्हणजे दर महिन्याला ५० हून अधिक नवीन कॅन्सरच्या रुग्णांचे निदान सीपीआर हॉस्पिटलमध्ये आता होऊ लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थ रुग्णांना दिलासा मिळाला आहे.कॅन्सरचे¹ लवकर निदान होत असल्यामुळे रुग्णांना जणू जीवदानच मिळत आहे.त्याचप्रमाणे कॅन्सरला पहिल्याच टप्प्यात ओळखून त्याला हरवणे शक्य होत आहे.