जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
मणिपूर राज्यात दोन महिलांची विवस्रघिंड काढल्या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, संपूर्ण देशभरात एक संतापाची लाट व्यक्त होत आहे. मणिपूर राज्यातील घटना ही संपूर्ण सूसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी असून, मला या घटनेमुळे हृदयद्रावक वेदना झाल्या असून, कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना सोडले जाणार नसल्याचे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात घडलेल्या व संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या ,महिला अत्याचाराच्या भीषण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले. संसदेचा पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवसाच्या कामकाजाच्या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना संबोधित करत असताना, मणिपूर राज्यातील भीषण जातीय हिंसाचारावर घडलेल्या घटनेवर अखेर आपले मौन सोडत वरील विधान केले. मात्र मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेनसिंह यांना पदमुक्त करण्याबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या तरी मौन बाळगले आहे दरम्यान मणिपूर मध्ये घडलेल्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. देशात महिला वर्गात याबद्दल चीड निर्माण झाली असून, सदरहू झालेल्या घटनेबद्दल गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी देशातील महिला वर्गात सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे.